Satish Alekar
आळेकरी नाट्यकालावकाश पुष्कळसा दोन पिढ्यांमधे विभागलेला आहे. इतर नाटकांमध्ये ’झुलता पूल’प्रमाणे सामाजिक अवकाशांची दखल नाही, तर दोन पिढ्यांच्या एकूण कालावकाशातला फरकच प्रमुख ठरला आहे. पिढीपिढीत काळाचा फरक अध्याहृत आहे. ह्या नाटकांमधे पुढच्या पिढीचा भौतिक अवकाश बदलतोच असं नाही. गाव ते शहर, भारत ते परदेश अशा तऱ्हेचा अवकाश-बदल नाही. त्याच्यामुळे काही पिढीपिढीतले संबंध ठरत नाहीत. पण पिढीपिढीतले मानसिक अवकाश मात्र खूप बदलतात. हे काळ बदलल्यामुळेच घडलेलं असतं, स्थलांतरामुळे नाही. त्यामुळे ते अधिक उसतातही. उदाहरणार्थ, ’महानिर्वाण’, ’महापूर’, ’अतिरेकी’, ’पिढीजात’, ’एक दिवस मठाकडे’ आणि बहुतेक नाटकांत वेगवेगळे ’तो’ स्वतः काही करण्याचा प्रयत्नच न करता आधीच्या पिढीवर खुन्नस काढताना दिसतात. त्याची चिडचिड समजून घेता येते, पण ते स्वतःला बहाल करणार हौतात्म्य वलय अनाकलनीय वाटत राहतं.- राजीव नाईक(’आळेकरी नाट्यकालावकाश’, मुक्त शब्द ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१)